नांदेडच्या देगलूर नाक्यावर गुटखा आणि खर्रा व्यवसाय तेजीत; लाखोंची कमाई करणारे दुकानदार तरुण पिढीला मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत

नांदेड – शहरातील देगलूर नाका परिसरात गुटखा व खर्र्याचा अवैध व्यापार दिवसेंदिवस बळावतो आहे. खुलेआम विकल्या जाणाऱ्या या जहराच्या पदार्थांमुळे केवळ कायद्याचे उल्लंघन होत नाही, तर तरुण पिढीला कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांकडे ढकलले जात आहे.
या व्यवसायातून दररोज लाखोंची कमाई करणारे हे दुकानदार केवळ पैशाच्या मागे लागले असून, समाजाच्या आणि विशेषतः तरुणांच्या आयुष्याची पूर्णपणे हेळसांड करत आहेत. हे दुकानदार खरं तर समाजद्रोही आहेत, जे गुटखा आणि खर्रा विकून तरुणांच्या जीवनाशी खेळ खेळत आहेत.
देशभरात गुटख्यावर बंदी आहे, पण खर्र्यासारख्या घातक पदार्थांवर अजूनही ठोस बंदी नसल्यामुळे तरुण सहजपणे या सवयीच्या आहारी जात आहेत. परिणामी, अनेक तरुण आज कॅन्सरसारख्या असाध्य रोगांचा सामना करत आहेत. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, देशात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्याचा धोका अंदाजापलीकडे गेला आहे.
स्थानिक प्रशासनाची या प्रकारावर असलेली शांतता अनेक शंका उपस्थित करते. प्रशासनाला या दुकानांची माहिती नसेल असे वाटत नाही, मग कारवाई का होत नाही? हे कुठल्यातरी मिलीभगतीचे संकेत आहेत का?
या जहराच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी नागरिकांचे काही ठाम मागणी पुढे येत आहेत: देगलूर नाका आणि संपूर्ण नांदेड शहरात गुटखा व खर्रा विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी
अशा विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी
शाळा, महाविद्यालय परिसरात विशेष पथके तैनात करण्यात यावीत
तरुणांमध्ये जनजागृती मोहीम राबवून या व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगावेत
जर प्रशासन आणि सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर एक संपूर्ण पिढी या व्यसनाच्या आहारी जाईल. आता केवळ चर्चा करून उपयोग नाही, तर कठोर आणि तात्काळ कृतीची गरज आहे. समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने आवाज उठवून या घातक प्रवृत्तीला थांबवले पाहिजे.



