ग्राम दरबार उपक्रमातून गावकऱ्यांशी थेट संवाद; उमरी तालुक्याचा विभागीय आयुक्तांकडून गौरव

नांदेड, 4 जून- छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून मराठवाडा विभागात एक दिवस गावकऱ्यांसोबत अर्थात ग्राम दरबार हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य यशस्वीरीत्या सुरू आहे.
ग्राम दरबारांतर्गत नांदेड जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख गावात प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आहेत. योजनांची माहिती देणे, शंका निरसन करणे व प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या उपक्रमात उमरी तालुक्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 16 ग्रामपंचायतींमध्ये ग्राम दरबार यशस्वीरित्या संपन्न झाले आहेत. या उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल गटविकास अधिकारी व्ही. आर. आरबडवाड यांना विभागीय आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्रत्येक बुधवारी एका गावात हा उपक्रम राबविला जात आहे. प्रारंभी मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये तर नंतर लहान ग्रामपंचायतींमध्येही या उपक्रमाचा विस्तार करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी तपासणी, आरोग्य शिबिरे, पशुसंवर्धन विभागाच्या सेवा, तसेच विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी गट विकास अधिकारी आरबडवाड यांचे विशेष अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही ग्राम दरबार उपक्रम प्रभावीपणे राबविला जात असून, शासनाच्या योजनांचा लाभ थेट ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.



