नांदेडकरांच्या मनात कायम घर करणारी कारकीर्द; पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार – किशोरकुमार वागदरीकर

नांदेड : प्रशासकीय सेवेत अधिकारी येतात, जातात, बदल्या होतात; मात्र काही अधिकारी आपल्या कामाच्या ठशांनी जनतेच्या मनावर अशी छाप सोडून जातात की, त्यांच्या बदलीची बातमीही नागरिकांच्या मनाला चटका लावून जाते. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे असेच एक व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. गुन्हेगारीविरोधातील त्यांची कठोर भूमिका, सर्वसामान्य नागरिकांशी ठेवलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि प्रशासनातील पारदर्शकता यामुळे त्यांनी अल्पावधीतच नांदेडकरांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश ठेवण्यात आला. विविध प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात त्यांनी सातत्याने कठोर कारवाया केल्या. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता धडक कारवाई करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली. विशेषतः रेती माफियांविरोधात उचललेली कठोर पावले आणि दंडात्मक कारवायांमुळे जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण झाला.
एवढेच नव्हे तर “ऑपरेशन फ्लॅश आऊट” आणि “ऑपरेशन क्रॅकडाऊन” यांसारख्या विशेष मोहिमा राबवून त्यांनी गुन्हेगारीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. केवळ कार्यालयात बसून आदेश देणारे अधिकारी न राहता ते स्वतः रात्री-अपरात्री रस्त्यावर उतरले. नाकाबंद्या, तपास मोहिमा आणि संशयितांवरील कारवायांमध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेत गुन्हेगारांच्या अक्षरशः नाकी नऊ आणले. त्यांच्या या धाडसी आणि कृतीप्रधान कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली, तर पोलीस दलामध्ये नवचैतन्य संचारले.
विशेष म्हणजे, अबिनाश कुमार हे पोलीस अधीक्षक या अत्यंत जबाबदारीच्या आणि मोठ्या पदावर कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी असलेले मानवी नाते कधीही तुटू दिले नाही. कॉन्स्टेबलपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समस्या, अडचणी आणि व्यथा समजून घेण्यासाठी त्यांचे दार नेहमी खुले असायचे. केवळ समस्या ऐकून घेणेच नव्हे, तर त्यावर सकारात्मक मार्ग काढून समाधान देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला होता की, “आपल्या अडचणी ऐकणारा आणि न्याय देणारा एक अधिकारी आपल्या पाठीशी आहे.”
याच संवेदनशीलतेमुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याशी केवळ वरिष्ठ अधिकारी म्हणून नव्हे, तर कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याप्रमाणे जोडले गेले होते. त्यांच्या बदलीची बातमी समोर आल्यानंतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेली उदासी ही त्यांच्या नेतृत्वाची आणि माणुसकीची खरी पावती होती.
पत्रकारांशी असलेले त्यांचे संबंधही तितकेच विश्वासपूर्ण आणि आत्मीय होते. शहरातील गुन्हेगारी घटनांबाबत अचूक आणि वेळेवर माहिती उपलब्ध करून देण्याची त्यांची कार्यशैली पत्रकारांसाठी मोठा आधार ठरत असे. त्यामुळे जनतेपर्यंत सत्य, वस्तुनिष्ठ आणि वेळेवर बातम्या पोहोचण्यास मदत होत होती. एखादा गुन्हेगारी विषयक संदेश किंवा व्हॉट्सॲपवर आलेली माहिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली की, त्यावर तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या यंत्रणेला सूचना करण्याची त्यांची सवय होती. त्यामुळे प्रशासन, पत्रकार आणि नागरिक यांच्यामध्ये विश्वासाचा एक मजबूत सेतू उभा राहिला.
अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना अधिक दृढ झाली. पोलीस दल केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून समाजाचा आधारस्तंभ आहे, ही भावना त्यांच्या कार्यपद्धतीतून सातत्याने दिसून आली. ता. २३ जून रोजी त्यांच्या बदलीची बातमी समोर आल्यानंतर अनेक नांदेडकरांच्या मनात हळहळ निर्माण झाली. कारण अबिनाश कुमार हे केवळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नव्हते, तर ते नांदेडच्या जनतेच्या सुख-दुःखाशी जोडले गेलेले एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी बनले होते. त्यांच्या साधेपणाने, स्पष्टवक्तेपणाने आणि न्यायप्रिय भूमिकेमुळे सर्व स्तरातील नागरिक त्यांच्याशी आपलेपणाने जोडले गेले.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सहजता, माणुसकी आणि आपलेपणाची भावना प्रत्येकाला भावली. म्हणूनच त्यांच्या बदलीची बातमी समोर येताच अनेकांच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. मराठी माणूस स्वभावाने स्पष्टवक्ता असतो, कधी कधी शब्द कठोरही असतात; पण त्याचे मन मात्र अत्यंत हळवे असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कृतीने, प्रामाणिकपणाने आणि माणुसकीने मन जिंकते, तेव्हा तिच्या जाण्याची खंत शब्दांत व्यक्त करता येत नाही.
आज त्यांच्या बदलीच्या निमित्ताने नांदेडकरांच्या मनात एकच भावना दाटून येत आहे — “अधिकारी बदलतात, पण काही माणसे आठवणी बनून कायम मनात राहतात.” अबिनाश कुमार यांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रामाणिकपणाने आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीने नांदेडकरांच्या हृदयात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
त्यांची कारकीर्द केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याची नव्हे, तर जनतेचा विश्वास जपणाऱ्या, सहकाऱ्यांना आधार देणाऱ्या आणि समाजाशी भावनिक नाळ जोडणाऱ्या लोकाभिमुख पोलीस अधिकाऱ्याची म्हणून कायम स्मरणात राहील. नांदेडच्या जनतेच्या मनातील “अबिनाश कुमार” हे नाव आणि त्यांच्याशी जोडलेल्या असंख्य आठवणी काळाच्या ओघातही ताज्याच राहतील.
आज अनेकांच्या ओठांवर एकच भावना आहे — “साहेबांची बदली झाली, पण त्यांनी जिंकलेली माणसं आणि निर्माण केलेल्या आठवणी कायम नांदेडच्या हृदयात जिवंत राहतील.”
नांदेडकरांच्या मनात विश्वास, आदर आणि आपुलकीची अमिट छाप सोडणाऱ्या पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने “आठवणीत राहणारी कारकीर्द” ठरली आहे. त्यांच्या बदलीमुळे नांदेडकरांच्या मनात त्यांच्या कार्याचा, माणुसकीचा आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा ठसा अधिक गडद झाला आहे. अधिकारी बदलतात, पदे बदलतात; मात्र आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या हृदयात घर करणारी माणसे काळाच्या ओघातही विसरली जात नाहीत. अबिनाश कुमार हे त्यापैकीच एक नाव असून, नांदेडकरांच्या स्मरणात त्यांची कार्यशैली, त्यांची संवेदनशीलता आणि त्यांचे कर्तृत्व दीर्घकाळ जिवंत राहील.



