माहूर किल्ल्याच्या जतन दुरुस्तीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची मान्यता!

किनवट (अकरम चव्हान) महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाणे पडझडीच्या मार्गावर असलेल्या माहूर किल्ल्याच्या जतन दुरुस्तीला मंजुरी दिली असून काल दिनांक ९ शुक्रवारी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाला १३ कोटी ८७ लक्ष २३ हजार ५०६ रुपयांच्या निधीला (वस्तु व सेवाकरासह) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्र माहूर हे भौगोलिकदृष्ट्या १९:४५ उत्तर रेखांश आणि ७७:५३ रेखांश पठारावर असलेला प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे, या किल्ल्याला दोन तट आहेत.किल्ल्याचा विस्तार ९ कि.मी. असून या किल्ल्याला डोंगरी किल्ला, गिरी दुर्ग गोंड किल्ला असेही म्हटल्या जाते. किल्ल्याचा पहिला तट राष्ट्रकूट राजींनी तर दुसरा तट देवगिरी साम्राज्याचे राजा रामदेवराय यादव यांनी बांधला आहे. विशेष बाब अशी की, राष्ट्रकुटांनी देवगिरी किल्ला, कंधारचा किल्ला व माहूरचा रामगड किल्ला एकाच कालखंडात बांधला असल्याचे बांधकाम शैली व वास्तुच्या बाबीतील साम्यावरून स्पष्ट होते. प्रवेशद्वारावर संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार भिंत बांधलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी रस्त्याने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी वाटेने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वार १३ फूट उंच आणि १० फूट रुंद आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून ७२५ फूट अंतरावर दुसरे प्रवेशद्वार आहे. रामगिरी किल्ल्यातील इंजाळा तलाव (फुलतीर्थ) जलाशय दुसरे मातृतीर्थ आहे.
चोहोबाजूंनी चिरेबंदी बांधकाम असून दोन दोन कठडे आहेत. हवामहलची उंची ५३ फूट व लांबी ५२ फूट आहे. हत्ती दरवाजातून पुढे गेल्यास उजवीकडे पश्चिमेस चिनी महल बांधलेला आहे. या ठिकाणीसद्धा सैनिक तैनात असायचे. चिनी महलाच्या पश्चिमेस निशाण बुरूजाजवळ दोन मशीद आहेत. किल्ल्यामध्ये त्याकाळी जलव्यवस्थापनाची साधने म्हणजे बारव, तलाव, कटोरा बावडी, गौतम झरा आहेत. जवळपास ५० टक्के भाविक किल्ला पाहण्यासाठी व पर्यटनाचा व निसर्गसान्निध्याच्या सहवासाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी येतात.
मात्र, मागील सात आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये डागडुजीसाठी खर्च केला होता, हा किल्ला काम झाल्यानंतर अवघ्या दोन चार वर्षांतच पूर्वीसारख्याच बकाल अवस्थेत पोहोचला.तेव्हा पासून किल्ल्याची संपूर्ण माहिती पर्यटकांना देणारी यंत्रणा व इतर कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे. समुद्रसपाटीपासून २६ फूट उंचीवर इ. स. ७५८ मध्ये बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर होता,वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये राज्याचे वित्त मंत्री यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबावत घोषणा केली. त्यानुषंगाने या कामा करिता नियुक्त वास्तुविशारद नंदादीप डिझायनर्स अॅण्ड व्हॅल्यूअर, छत्रपती संभाजीनगर यांचेकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले.१३ कोटी ८७ लक्ष २३ हजार ५०६ रुपयांच्या निधीला (वस्तु व सेवाकरासह) राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने या ऐतिहासिक किल्ल्याचे सौंदर्य बहरणार आहे.



