कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियानास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
ठिकठिकाणी लोप्रतिनिधींच्या हस्ते मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

नांदेड,2- राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने 1 मे पासून राज्यात सुरू झालेल्या कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू या विशेष स्वच्छता अभियानाला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या अभियानाचा लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
माहूर तालुक्यातील लांजी येथे विधान परिषद सदस्य तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते शेग्रीगेशन शेडचे उद्घाटन व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. किनवट तालुक्यातील पिंपळफोडी येथे आमदार भीमराव केराम यांनी कंपोस्ट खड्डा भरून अभियानाची सुरुवात केली. गावात स्वच्छता असेल तरच आरोग्य टिकेल, असा मूलमंत्र त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. कंधार तालुक्यातील बारुळ येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या अभियानाचा शुभारंभ करुन ग्रामदरबारात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. हदगाव तालुक्यातील बेलमंडळ येथे आमदार बाबुराव कोहळीकर यांनीही उपस्थित राहून स्वच्छतेचा संदेश दिला. तर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव तिडके बोंढारकर यांनी लोहा तालुक्यातील दगडगाव व नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथे हजेरी लावून अभियानाचा शुभारंभ केला.
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते शेग्रीगेशन शेडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी कंपोस्ट खड्डा भरून या अभियानाचा शुभारंभ केला. लोकसहभागातूनच गाव स्वच्छ राहू शकते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यांनी वैयक्तिक कचऱ्याचे डस्टबिन वितरित केले व आरोग्य उपकेंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यालाही भेट दिली.
हे अभियान 1 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दिनांक 1 ते 10 मे दरम्यान गावात कंपोस्ट खड्डे ओला कचरा, शेण, माती व पाणी घालून ते भरले जाणार आहेत. 120 दिवसांनंतर यातून तयार होणारे सेंद्रिय खत शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे. या उपक्रमात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी, सरपंच, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा कक्षातील तज्ञ, सल्लागार, तालुका गट समन्वयक, समुह समन्वय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



