स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणासाठी समिती सदस्यांचे प्रशिक्षण सुरू
20 जुलैपर्यंत जिल्हाभरात टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणांचे आयोजन

नांदेड, 12- जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यात ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. सध्या किनवट व माहूर तालुक्यांमध्ये या प्रशिक्षणांचे सत्र सुरु असून, किनवट येथे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिनांक 13 व 14 जून रोजी पार पडणार आहे. या प्रशिक्षणाची माहिती देताना जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी सांगितले की, दिनांक 20 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल.
जलजीवन मिशनचा उद्देश दरडोई 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक घरात नळाव्दारे उपलब्ध करून देणे, जलस्त्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करणे, तसेच पाण्याच्या पुनर्वापर व संकलनाच्या माध्यमातून कार्यक्षम प्रणाली निर्माण करणे असा आहे. यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.
प्रशिक्षणात जलस्त्रोतांचे बळकटीकरण व शाश्वतीकरण, स्थानिक समुदायांचा सहभाग, पाणीटंचाई क्षेत्रांना प्राधान्य, शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी संस्थात्मक व तांत्रिक क्षमता निर्माण करणे या बाबीवर विशेष भर देण्यात येणार आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व टॅक्नोस्पर्ट ग्राम विका प्रतिष्ठाण परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे अनिवासी प्रशिक्षण दोन दिवसीय असून प्रत्येक ग्रामपंचायतीमधून पाणीपुरवठा समितीतील पाच सदस्यांचा सहभाग आवश्यक आहे. प्रशिक्षणाची वेळ व स्थळ यासंदर्भातील माहिती गट विकास अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित समित्यांना कळवण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये जलजीवन मिशनच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती व प्रत्यक्ष अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व समिती सदस्यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जलजिवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल रावसाहेब यांनी केले आहे.



