जिला

‘शक्तिपीठ’, वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा

खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक

 

 

नांदेड, दि. १२ सप्टेंबर २०२५ / माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांसमवेत बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्ग, वन जमिनीचे पट्टे हस्तांतरित करणे आणि पोलीस भरतीतील उमेदवारांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली.

या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासह नांदेड महानगरचे भाजप अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, किशोर स्वामी आदी मंडळी उपस्थित होती. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामध्ये सुपिक शेती व फळबागा संपादित होणार असल्याने अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे संरेखन बदलण्यासह विविध पर्यायांवर विचार करण्याची मागणी केली होती. आज झालेल्या बैठकीत या विषयावर विचारविनिमय करण्यात आला. शेतकऱ्यांनी सुचवलेल्या पर्यायांवर प्रशासनाने विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

वर्षानुवर्षे वन जमिनीवर वास्तव्य करणाऱ्या किंवा शेती करणाऱ्या नागरिकांना संबंधित जमिनीचे पट्टे हस्तांतरित करण्याची मागणी राज्य सरकारकडे विचाराधीन आहे. यामध्ये भोकर तालुक्यातील बंजारा व आदिवासी समाजातील अनेक नागरिकांचाही समावेश आहे. हा विषय पुढील तीन महिन्यात मार्गी लावण्याच्या अनुषंगाने महसूल व वनविभागाच्या वतीने नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याची सूचना माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केली.

राज्यातील भाजप महायुती सरकारने पोलीस विभागात नुकतीच पंधरा हजाराहून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या तयारीसाठी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना सरावाकरिता पुरेशी मैदाने उपलब्ध नसल्याची तक्रार खा. चव्हाण यांच्याकडे आली होती. त्या अनुषंगाने पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, अशीही सूचना त्यांनी या बैठकीत केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *