शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करा – काँग्रेसतर्फे नांदेड येथे धरणे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शहरी भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीला न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व खा. रविंद्र प. चव्हाण यांनी केले, तर अध्यक्षस्थानावर दक्षिण जिल्हाध्यक्ष हणमंतराव प. बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडेआणि महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देऊन खालील प्रमुख मागण्या मांडल्या —
जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी
पंचनाम्यानुसार भरीव मदत तात्काळ वाटप करावी
तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे
या वेळी जिल्हा व शहरातील मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठाम भूमिका मांडण्यात आली. छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर



