गटाच्या माध्यमातून नैसर्गिक, सेंद्रिय शेती करावी – प्रकल्प संचालक कोळपकर

अर्धापूर : उध्दव सरोदे – भविष्यात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार असून शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करावी असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन चे प्रकल्प संचालक श्री.नवनाथ कोळकर यांनी केले.ते धामदरी ता. अर्धापूर येथे सेंद्रिय नैसर्गिक शाश्वत योगिक शेती बाबत कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.भाऊसाहेब बराटे, तालुका कृषी अधिकारी श्री.विशाल बिराडे,
मंडळ कृषी अधिकारी श्री. सुनील शिवाजी देवकांबळे,कृषी भूषण भगवानभाई इंगोले संचालक शेतकरी मित्र कंपनी मालेगाव, ब्रह्मकुमारी स्वाती बहिणजी,शेतकरी नेते श्री.प्रल्हाद इंगोले,कृषी पर्यवेक्षक श्री.विजय आनंद भोसले,ब्रह्मकुमारी वनिता बहनजी,ब्रह्मकुमारीवंदना बहिणजी यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्री.बराटे साहेबांनी ग्राम कृषी विकास समिती व ग्रामसभेचे महत्त्व सांगितले.
अशा माध्यमातून गावातील प्रश्न व शेती विषयक समस्या कसे सोडवता येईल यावर चर्चा केली.श्री नवनाथ कोळकर सरांनी पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेचे सखोल मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गटनिर्मिती व समूह निर्मिती करून सेंद्रिय शेती करण्याचे आव्हान केले. तालुका कृषी अधिकारी श्री.बिराडे यांनी पोकरा योजने विषयी सखोल मार्गदर्शन केले तर श्री.देवकांबळे एस एस.यांनी महाडीबीटी वरील सर्व योजनांची माहिती देवून कृषीभूषण श्री.भगवानभाईजी इंगोले यांनी नैसर्गिक शेती कशी करावी,बांधावर झाडे लावून जमिनीतील पालापाचोळा उसाची पाचड,काडी,कचरा न जाळता त्याचे कंपोस्ट करून जमिनीमध्ये द्यावे,शेणखतावर प्रक्रिया करावी व उत्पादित केलेल्या मालांची पॅकिंग ब्रँडिंग करून तो स्वतः विकावा, जीवामृत,दशपर्णी अर्क,निमार्क, गोकृपा अमृत,
त्याचे महत्त्व काय व बांधावर कसे तयार करावे,सेंद्रिय शेतीचे भविष्य कसे असेल याविषयी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ब्रह्मकुमारी स्वाती बहेनजी यांनी शेतीमध्ये शाश्वत यौगिक शेतीचे महत्व सांगून नैसर्गिक शेतीच्या प्रशिक्षणासाठी माउंट आबू ला जाण्याचे आवाहन त्यांनी केले. आध्यात्मिकता व शेतीचा कसा संबंध आहे,सकारात्मक विचारांचा योगाचा प्रभाव पाच तत्त्वावर पंचमहा भूतांवर पडतो त्यांचे सहकार्य मिळते, मेडिटेशन मुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढते जमिनीतील जिवाणू,बॅक्टेरिया, जीव जंतू यांची क्रियाशक्ती वाढते, प्रकृतीचे,प्राण्यांचे भुमातेचे संरक्षण करून परमात्माच्या आठवणी मध्ये केली जाणारी शेती म्हणजे शाश्वत यौगिक शेती आहे.या सर्वांविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच दत्तात्रेय नामदेवराव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रा.पं.सदस्य मुरलीधर कदम यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत दिगांबर कदम, मुरलीधर कदम,पांडुरंग कदम,रामजी कदम,महिला शेतकरी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.



