राज्यात नांदेड जिल्ह्याची पंचायत विकास निर्देशांकात सर्वोत्कृष्ट कामगिरी २५ पैकी ९ ग्रामपंचायती नांदेडच्या

नांदेड,१०- दिल्ली येथील भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयामार्फत २०२२-२३ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या पंचायत अॅडव्हान्समेंट इंडेक्स (PAI) मध्ये नांदेड जिल्ह्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राज्यभरातील पहिल्या २५ ग्रामपंचायतींच्या यादीमध्ये तब्बल ९ ग्रामपंचायती नांदेड जिल्ह्यातील असून, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतीने ८०.२१ गुणांसह राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
ही कामगिरी साध्य करताना पंचायत विकास निर्देशांकासाठी १६ विभागांमार्फत संकलित झालेला प्राथमिक डाटा ग्रामसभेमार्फत प्रमाणित करण्यात आला. त्यानंतर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर तपासणी होऊन अंतिमतः तो मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत गट अधिकारी, विभागीय नोडल अधिकारी तसेच ग्रामसेवकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
जिल्ह्यातील यशस्वी ग्रामपंचायतींमध्ये हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, पळसपूर, खडकी (बाजार), विरसानी, एकघरी, पारडी (ज) तसेच भोकर तालुक्यातील नारवट तर माहूर तालुक्यातील लांजी व तुलसी यांचा समावेश आहे. यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे नेतृत्व प्रभावी ठरले. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मेघनाथ कावली यांनीही या विषयाला चालना दिली आहे.
जिल्हाधिकारी तथा संकलन समितीचे अध्यक्ष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रमाणीकरण समिती सचिव मंजुषा कापसे, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, PDI प्रशिक्षक तथा सहायक राज्य समन्वयक मधुकर मोरे, जिल्हा परिषद नांदेड येथील अधिकारी सचिन सोनवणे व जगन्नाथ मुंडकर, ग्राम विकास अधिकारी शैलेंद्र वडजकर यांचे योगदानही मोलाचे ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशदाचे उपमहासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.



