पर्यावरण शपथ घेऊन स्वच्छता उपक्रमांची सुरुवात
पर्यावरण समृद्धीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

नांदेड,22- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पर्यावरण, आरोग्य व स्वच्छता उपक्रमांची जिल्ह्यात आजपासून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पर्यावरण शपथ घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते झाला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, अभियंता अशोक भोजराज, विशाल चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावस्तरावर पर्यावरणीय समृद्धीसाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले. दिनांक 22 मे ते 5 जून 2025 या कालावधीत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, प्लास्टिक संकलन, एकल वापराच्या प्लास्टिकचा टाळाण्यासाठी जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे महत्व जनमानसात पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही सीईओ मेघना कावली यांनी यावेळी केले.
गावस्तरावर विविध उपक्रम
याव्यतिरिक्त, दिनांक 28 मे रोजी मासिक पाळी व्यवस्थापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा व अंगणवाड्यांमार्फत किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, महिला बचत गट, महिला शिक्षक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. तसेच, दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या थीमअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये साजरा केला जाणार आहे. योग सत्राव्दारे नैसर्गिक जीवनशैलीचे महत्व, मानसिक व शारीरिक आरोग्य यावर भर दिला जाणार आहे.

पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाचा शुभारंभ
या कार्यक्रमात पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ देखील मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आला. हे अभियान दिनांक 7 जून पर्यंत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावांतील शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी एफ.टी.के. (FTK) किटच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याचे महत्व यासंदर्भात जनजागृतीही केली जाणार आहे.



