नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती; लष्कराची तुकडी दाखल होणार, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

नांदेड – नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. शहरातील अनेक घरामध्ये पाणी शिरले असून नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. पूरस्थिती गंभीर होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बचाव कार्यासाठी पुन्हा एकदा लष्कराची मदत मागवली असून लष्कराची तुकडी लवकरच नांदेडमध्ये दाखल होणार आहे.
सर्व शाळांना सुट्टी
पूरस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळांना आज शुक्रवार (२९ ऑगस्ट) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडले असून गोदावरी नदीपात्रात तब्बल ८८ हजार १४३ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला आहे.
शहरातील पाणी शिरलेले भाग
नांदेड शहरातील वसंतनगर, बाबानगर, मगनपुरा, राजर्षी शाहूनगर, नवा मोंढा, विनायकनगर, दत्तनगर, शारदानगर, सिडको, वसरणी, कौठा, गंगानगर, लुंबिनी नगर, विणकर कॉलनी, शिवनगर आदी भागातील घरामध्ये पाणी शिरले आहे. काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

महापालिकेची तयारी
नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सर्व आपत्ती व्यवस्थापन पथक, वार्ड ऑफिसर यांना फील्डवर राहण्याचे आदेश दिले आहेत. गरज भासल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी झोननिहाय उपायुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातही धोक्याची घंटा
ग्रामीण भागातही परिस्थिती तितकीच गंभीर असून मन्याड नदीला पूर आल्याने मनसकर्गा, मानूर, नंदुर, शेवाळा** गावांचा संपर्क तुटला आहे. लोहा-गंगाखेड रस्ता बंद करण्यात आला आहे. लोहा तालुक्यातील सुनेगाव गाव पाण्याच्या विळख्यात असून नागरिक अडकून पडले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे.

पूरग्रस्त नद्या
जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा, मन्याड, लेंडी, पैनगंगा यांसह इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणातून ५ लाख क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे, तर निजामसागर धरणाचा विसर्ग ५३ हजार क्यूसेकने कमी करण्यात आला आहे. यामुळे मांजरा नदीची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सतत सतर्क राहण्याचे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
–



