स्वच्छता ही सेवा ‘स्वच्छोत्सव’ अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा
- मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली

नांदेड, १७ – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ पंधरवडा दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वच्छोत्सव’ या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे, या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद प्रांरगणात येथे आज दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी स्वच्छता ही सेवा ‘स्वच्छोत्सव’ अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार ‘स्वच्छोत्सव’ हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या पंधरवड्यादरम्यान प्रमुख उपक्रमांतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करून साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव, स्वच्छ सुजल गाव संकल्पनेशी निगडित प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करून हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव व स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचे उद्दिष्ट आहे. २५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘एक दिवस – एक तास – एक सोबत’ या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या गावात सामूहिक श्रमदान करून स्वच्छता मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी केले आहे.
‘स्वच्छोत्सव’ अभियानात स्थानिक संस्था, विविध विभाग, कार्यालये, लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन प्रभावी जनजागृती राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात सहभागी होऊन या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमित राठोड, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी केले आहे.
या वेळी परिविक्षाधीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनन्या रेड्डी, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, सह. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (मा) माधवराव सलगर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता भोजराज आदींची यावेळी उपस्थिती होती.
स्वच्छता ही सेवा पंधरवडा म्हणजे केवळ मोहिम नसून हा सामूहिक कृतीचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागातूनच नांदेड जिल्हा स्वच्छ, निरोगी व सुजल बनविण्याचे ध्येय साध्य होईल.
स्वच्छता ही सेवा ‘स्वच्छोत्सव’ यामध्ये ‘एक दिवस – एक तास – एक सोबत’ मध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा. स्वच्छता ही केवळ एक वेळेची कृती नसून ती आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असावी. शाश्वत स्वच्छतेच्या दृष्टीने गावातील प्रत्येकाने यात सहभागी होणे गरजेचे आहे. या मोहीमे अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार असून त्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती, आणि गावातील शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या गावाला स्वच्छ व सुंदर ठेवावे. तसेच ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, जलजन्य साथरोग होऊ नये म्हणून प्रत्येक आठवड्यातील बुधवार हा दिवस “कोरडा दिवस” म्हणून पाळा. घरातील व परिसरातील साचलेले पाणी वाहते करा. अळ्यांचा नाश करून हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळवा. – मुख्य कार्यकारी अधिकारी, मेघना कावली



