कर्तव्यदक्ष ऑटोचालकाचा प्रामाणिकपणा: 20 हजारांचा मोबाईल परत

नांदेड (प्रतिनिधी) – आजच्या काळात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ होत चाललेला गुण असला तरी अजूनही समाजात काही व्यक्ती आपल्या आचरणातून आदर्श घालून देतात. अशाच एका सकारात्मक व प्रेरणादायी घटनेत टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य नसीर खान नदिम खान (रा. शिवाजीनगर, नांदेड) यांनी प्रवाशाचा हरवलेला मोबाईल परत करून प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण घालून दिले.
घटना अशी की, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्राचार्य शिल्पा कनावार (रा. पावडेवाडी नाका, नांदेड) या महिला प्रवासी नसीर खान यांच्या MH-26 BD-9973 या रिक्षातून पावडेवाडी नाका येथून एमजीएम कॉलेजपर्यंत प्रवास करत होत्या. कॉलेजमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, 20 हजार रुपये किंमतीचा *विवो कंपनीचा मोबाईल* रिक्षामध्येच राहून गेला आहे.
दोन तासांनी त्यांनी संपर्क साधल्यानंतर रिक्षाचालक नसीर खान यांनी मोबाईल त्यांच्या रिक्षातच असल्याची माहिती देत तो सुरक्षित असल्याचे सांगितले. तत्काळ त्यांनी ही माहिती टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) यांना दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक अविनाश कुमार साहेब आणि विमानतळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक कामठेवाड साहेब यांच्याकडे प्रकरणाची माहिती पोहोचवण्यात आली.
पोलिस निरीक्षक कामठेवाड साहेब यांनी प्राचार्य शिल्पा कनावार यांना पोलीस ठाण्यात बोलावून रिक्षाचालक नसीर खान यांच्या उपस्थितीत मोबाईल परत करण्यात आला. या वेळी टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा), पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब, शहर सहसचिव गंगाधर सरोदे, कोषाध्यक्ष धम्मपाल थोरात, कार्याध्यक्ष संजय शेळके आदी उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्य शिल्पा कनावार यांनी रिक्षाचालक नसीर खान यांचा सन्मान करत त्यांना दोनशे रुपयांचे बक्षीस दिले. तसेच पोलिस व टायगर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही नसीर खान यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.



