नांदेड : गोदावरी नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले – नागरिकांना मोठ्या अडचणी, एसडीपीआयने केली मदत


नांदेड शहर व परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या समस्येत भर पडली आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये रात्रीपासूनच पाणी घुसायला सुरुवात झाली असून नागरिकांना घरातील सामान बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्याची मोठी धावपळ करावी लागली. महिलांना व लहान मुलांना रात्रभर जागून काढावी लागली, तर वृद्ध व आजारी व्यक्तींना बाहेर काढताना मोठ्या अडचणी आल्या.
वस्त्यांतील घरात गुडघ्यापर्यंत पाणी शिरल्याने भांडी, कपडे, बिछाने आणि दैनंदिन वापराचे साहित्य खराब झाले आहे. अनेक कुटुंबांना आपली घरे सोडून नातेवाईकांकडे किंवा शासकीय शाळांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.
अशा कठीण परिस्थितीत सोशियल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) तर्फे प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोईनपूरा व नागाठ भागातील पीडित कुटुंबांपर्यंत जाऊन अन्नसामग्री पोहोचवली व त्यांचे मनोबल वाढवले. एसडीपीआयच्या या उपक्रमाचे स्थानिकांनी कौतुक करत म्हटले की, कठीण प्रसंगी मिळालेल्या या मदतीने दिलासा मिळाला आहे.
या वेळी एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष अहमद नदीम, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफीक, जिल्हा सरचिटणीस अब्दुल हसीब, जिल्हा समिती सदस्य अतीकुर्रहमान, मोहम्मद रफीक सर, अकबर खान तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आश्वासन दिले की येत्या काळातही गरजूंना मदतीसाठी धान्य व खाद्यपदार्थ पुरवले जातील, जेणेकरून कोणतेही कुटुंब उपाशी राहणार नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, तातडीने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मदत शिबिर उभारून पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा पुरवाव्यात, जेणेकरून अधिक अडचणींना सामोरे जावे लागू नये.



