रात्रीच्या अंधारात नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
चौफाळा-भाळेश्वर नगर नदीकाठच्या रहिवाशांना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हातभार

नांदेड : गोदावरी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने चौफाळा व भाळेश्वर नगर नदीकिनाऱ्यावरील नागरिकांना मध्यरात्री स्थलांतर करण्याची वेळ आली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेत शिवसेना जिल्हा उपसंघटक व प्रभाग क्र. 14 निरीक्षक गजानन साहेबराव हारकरे पाटील यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिवसैनिकांच्या मदतीने मोठा उपक्रम राबवला.
या मोहिमेत महिलांपासून लहान मुलांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले. नागरिकांना ज्येष्ठ नागरिक विरंगळा केंद्र, विठ्ठल मंदिर व जिल्हा परिषद शाळा येथे तात्पुरत्या स्वरूपात निवारा देण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी नदीकाठच्या भागात असलेल्या नागरिकांना जागे करून त्यांचे सामानासकट सुरक्षितपणे स्थलांतरित करणे हे काम अत्यंत धाडसाचे होते. मात्र हारकरे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्परतेने हे कार्य पूर्ण केले.
या उपक्रमामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, स्थानिकांनी हारकरे पाटील आणि शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



