सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत
- मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे निर्देश

नांदेड,3- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील गावे मॉडेल करण्याच्या उद्देशाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे गावस्तरावर सुरू आहेत. अद्याप अपूर्ण असलेल्या 159 गावांतील सर्व शिल्लक कामे 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिले.
या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब तसेच अभियंता अशोक भोजराज उपस्थित होते.
बैठकीत सांडपाणी व्यवस्थापनासाठी वैयक्तिक व सार्वजनिक शोषखड्ड्यांची निर्मिती तर घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा विलगीकरण केंद्रे, वैयक्तिक व सार्वजनिक डस्टबिन, ट्रायसायकल व प्लास्टिक केज यांसारख्या कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील एकूण 1535 गावांपैकी 1316 गावांची कामे पूर्ण झाली असून 57 गावे जिल्हास्तरीय आहेत. उर्वरित 159 गावांमध्ये अद्यापही काही कामे अपूर्ण आहेत, याबाबत आज सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या गावांतील सर्व कामे 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून 27 नोव्हेंबर रोजी पुन्हा आढावा घेण्यात येईल, असे सांगितले. तसेच, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना गावे मॉडेल करण्याच्या उद्देशाने पूर्ण क्षमतेने कार्य करा, असे आवाहन केले. या बैठकीस तालुकास्तरावरील विस्तार अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी, तालुका गट समन्वयक व समूह समन्वयक उपस्थित होते.



