अर्धापूरमध्ये हृदयद्रावक घटना दोन निष्पाप चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू; निमगाव गाव शोकसागरात


अर्धापूर, नांदेड — अर्धापूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी एक अत्यंत वेदनादायी दुर्घटना घडली. घरासमोर आनंदात खेळत असलेल्या दोन चिमुकल्यांनी अचानक पाण्यात पडून जीव गमावल्याची घटना पुढे आली असून निमगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, निमगाव येथील रामा मोहन राठोड यांचा नातू स्वस्तिक सचिन राठोड (वय अडीच वर्षे) आणि दिवाळीनिमित्त बेलखेड (ता. उमरखेड) येथून आलेली नात श्रावणी विठ्ठल चव्हाण (वय २ वर्षे) हे दोघेही घरासमोर नेहमीप्रमाणे खेळत होते. खेळता–खेळता त्यांचे पाय इसापुर कॅनॉलजवळील कालवा परिसरात गेले आणि तोल जाऊन दोघेही पाण्यात कोसळले.
बराच वेळ मुलं दिसेनाशी झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली. काही अंतरावर इसापुर कॅनॉलमध्ये मुलांची थरकाप उडवणारी अवस्था आढळून आली. त्वरित त्यांना निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबांवर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला असून शांत निमगाव गावात शोककळा पसरली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या अनर्थाने सर्वजण व्यथित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.




