रामपूर येथे जल महोत्सव उत्साहात साजरा पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज- दत्तात्र्य कुरूंदे

नांदेड, 17- भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता पाण्याचे जतन व संवर्धन अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी पाणी जमिनीत मुरविणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सहाय्यक गट विकास अधिकारी दत्तात्र्य कुरूंदे यांनी केले.
देगलूर तालुक्यातील रामपूर येथे आयोजित जल महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल ही योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या गावांमध्ये 8 ते 22 मार्च दरम्यान जल महोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून देत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्नेहाताई पांडवे होत्या. त्यांनी सांगितले की, रामपूर ग्रामपंचायतीमार्फत गावातील सर्व कुटुंबांना जल जीवन मिशन अंतर्गत नियमित व शुद्ध पाणीपुरवठा केला जात असून, ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगीतले. यावेळी उपअभियंता व्ही. जी. जाधव यांनी उपलब्ध पाणीस्त्रोत बळकट करून भविष्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी प्रशासन ग्रामस्थांना पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाची सुरुवात जलपूजनाने करण्यात आली. त्यानंतर पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सहशिक्षक अशिष गडपसार यांनी उपस्थितांना जलसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. तसेच पाणी नमुना तपासणी करणाऱ्या महिलांचा व जलपुरवठा कर्मचारी अनिल इंगोले यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर जल अर्पण दिवस कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयापासून पाणी टाकीपर्यंत व गावातील प्रमुख रस्त्यांवरून जल रॅली काढण्यात आली. या रॅलीत शालेय विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



