जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी खतांचा संतुलित वापर आवश्यक – डॉ. निलकुमार ऐतवडे

नांदेड,२४- जमिनीची सुपीकता व आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करताना सेंद्रिय व जैविक खतांचाही योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकी व असंतुलित वापरामुळे मातीचे आरोग्य खालावतेच, शिवाय मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी केले.

इंडियन पोटॅश लिमिटेड खत कंपनीतर्फे प्रधानमंत्री प्रणाम अभियानांतर्गत मुदखेड तालुक्यातील इजळी येथे गुरुवार, दि. २३ जुलै रोजी आयोजित ‘उर्वरक की पाठशाला’ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करावी तसेच जैविक खते, गांडूळ खत, हिरवळीचे खत आणि कंपोस्ट खतांचा वापर वाढवावा. ऊसाचे पाचट जाळण्याऐवजी ते जमिनीत गाडल्यास मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकता टिकून राहते. रासायनिक खतांच्या बेहिशोबी वापरामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने संतुलित खत व्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रातील विविध घटकांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी येथील शास्त्रज्ञ डॉ. जायभाये तसेच जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी सचिन कपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.



