ग्रामीण भागात स्वच्छ माझे आंगण अभियानाची आजपासून सुरुवात
नागरिकांनी सहभागी व्हावे; ग्रामपंचायत स्तरावर कुटुंबांचा होणार सन्मान

नांदेड, 31- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत स्वच्छ माझे आंगण अभियान दिनांक 1 जानेवारी 2025 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असून नांदेड जिलहयातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.
प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझरखड्ड्यांचा वापर करणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहेत.
या अभियानात स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांचा 26 जानेवारी रोजी ग्रामसभेत प्रशस्तीपत्र, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करून इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नियमांचे पालन करावे. यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
महिला बचत गट व ग्रामस्थांनी या अभियनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. संजय तुबाकले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.
अभियानाचा कालावधी व टप्पे:
अभियान कालावधी: 1 जानेवारी 2025 ते 20 जानेवारी 2025
पडताळणी कालावधी: 21 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025
पात्र कुटुंबांना निमंत्रण: 25 जानेवारी 2025
प्रशस्तीपत्र व सन्मान: 26 जानेवारी 2025



