बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजार भरवण्यास सरकारचा यू-टर्न, वंचित बहुजन आघाडीचा दबाव यशस्वी

नांदेड | ३ जून २०२५ : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यापूर्वी ३ ते ७ जून २०२५ या कालावधीत राज्यभर गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार विरोध झाल्यानंतर आता सरकारने दुसरे परिपत्रक काढून बाजार भरवण्यास परवानगी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी सांगितले की, “ही सरकार लोकांच्या उपजिविकेवर घाला घालणारी आणि बेकायदेशीर पद्धतीने नागरिकांना त्रास देणारी आहे. आम्ही याला वेळेवर विरोध केला आणि अखेर सरकारला झुकावे लागले.”
सुरुवातीच्या परिपत्रकात महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सूचनेनुसार गुरांच्या बाजारावर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे अनेक शेतकरी, दलाल, गाडीचालक, मजूर, कुरेशी-खटिक समाजातील कुटुंबांचे आर्थिक नुकसान होणार होते. वंचित बहुजन आघाडीसह अनेक सामाजिक संघटनांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता.
फारूक अहमद यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “सणाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे जनतेच्या उपजिविकेवर गदा आणणारे निर्णय घेणे हे अलोकशाहीचे लक्षण आहे. आम्ही आवाज उठवल्यानंतरच बाजार परवानगीबाबत दुसरे परिपत्रक जारी करण्यात आले.”
दुसऱ्या परिपत्रकानुसार, गुरांचे बाजार ३ ते ८ जून या काळात भरवले जातील, मात्र गोवंशाची कत्तल होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने बाजार भरवण्याची परवानगी दिल्यानंतर शेतकरी व व्यापार्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने यापुढेही अशा अन्यायकारक निर्णयांना विरोध करणार असल्याचे फारूक अहमद यांनी जाहीर केले.
लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न आणि उपजिविकेचे प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजेत. वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष हा सामान्य जनतेच्या आवाजाचा विजय असल्याचे मानले जात आहे.



