अतिवृष्टीग्रस्त 17 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान; मनरेगा अंतर्गत प्रति हेक्टर ३ लाखांपर्यंत निधी उपलब्ध

नांदेड,13- जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची तालुकास्तरीय समित्यांमार्फत झालेल्या पडताळणीनुसार एकूण 17 हजार 124 शेतकऱ्यांचे सुमारे 4 हजार 619 हेक्टर क्षेत्र खरडून गेल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) या शेतजमिनी सुधारणा कामांसाठी प्रति हेक्टर कमाल तीन लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, 13 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे खचलेल्या वा बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीकरिता पात्र शेतकऱ्यांना विहिरीसाठी 30 हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 15 हजार रुपये आगाऊ स्वरूपात देण्यात येतील, तर उर्वरित 15 हजार काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील.
तरी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या अर्जांची पूर्तता करून तालुका पंचायत समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे. अशी माहिती नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी दिली आहे.



