जिल्ह्यात राष्ट्रीय पंचायती राज दिन उत्साहात साजरा करावा

नांदेड, २३- केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार शुक्रवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विविध उपक्रम राबवून हा दिवस उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जल जीवन मिशन यांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये ग्रामपंचायतींची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता, हा दिवस लोकसहभागातून पाणी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याची संधी म्हणून साजरा करण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या निमित्ताने गावपातळीवर ग्रामसभांचे आयोजन, स्वच्छता मोहिमा, जलसंवर्धनाबाबत जनजागृती, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आदी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचायती राज व्यवस्थेद्वारे ग्रामविकासात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम बनविणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.



