मुदखेड–वाजेगाव राज्य महामार्गाचे काम रखडले; पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वाची मागणी तीव्र
“पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार का?”

मुदखेड तालुका प्रतिनिधी – मोहम्मद हकीम / मुदखेड–वाजेगाव राज्य महामार्ग 261A वरील सिमेंट रस्त्याचे मजबुतीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, येत्या दोन महिन्यांत पावसाळा सुरू होणार असल्याने वाहतूक व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाजेगाव ते मुदखेड या 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुमारे 220 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारमार्फत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, कामाची गती अत्यंत मंद असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, उपकार्यकारी अभियंता सोनकांबळे यांनी संबंधित काम त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधावा.
मुदखेड–नांदेड मार्गासाठी राज्य महामार्ग 436 वरून ब्राह्मणवाडा मार्गे जावे लागते. या मार्गावर रेल्वे गेटजवळ सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम अद्याप अपूर्ण व कच्च्या अवस्थेत आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय, मुदखेड शहराजवळील सीता नदीवरील संरक्षण भिंतीचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून रखडले आहे. तसेच आमदुरा परिसरातील गोदावरी नदीवरील पुलाचे कामही तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून रखडलेली कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे विस्तारीकरण व मजबुतीकरण पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



