नांदेडमध्ये ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025’ ला भव्य सुरुवात – डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या कार्याचे पालकमंत्र्यांकडून गौरव

नांदेड – आज नांदेडचे पालकमंत्री नामदार श्री. अतुल सावे यांच्या हस्ते सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025 चे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. या वेळी जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले, माजी आमदार भाजपा महानगर अध्यक्ष श्री. अमर राजूरकर, भाजप संघटन मंत्री श्री. संजयजी कोडगे, श्री. चैतन्य बापू देशमुख, श्री. संतुकराव हंबर्डे, श्री. आशुतोष जोशी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. शिवानंद मिनगिरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. अतुल सावे म्हणाले, “सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हा केवळ कार्यक्रम नाही, तर विविध कला, संस्कृती आणि स्पर्धांचा एक अद्वितीय संगम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा व महोत्सव यशस्वीपणे आयोजित करणे ही सोपी गोष्ट नाही. डॉ. सान्वी जेठवाणी आणि त्यांच्या टीमने घेतलेले हे धाडस कौतुकास्पद असून, नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे नांदेडचे नाव सांस्कृतिक नकाशावर उजळून निघेल.”
या भव्य महोत्सवात सात राज्यांतून आलेले तृतीयपंथी बांधव विशेष आकर्षण ठरले आहेत. त्यांनी केवळ सांस्कृतिक सादरीकरणच केले नाही, तर विविध हस्तकला, गृहउपयोगी वस्तू, वस्त्रनिर्मिती, अलंकार आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून आपल्या कौशल्याची झलकही दाखवली आहे. या स्टॉल्सला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सोशल आयकॉन पुरस्काराने श्री. गणेश महाजन, आरोग्य भूषण पुरस्काराने लायन्स नेत्र रुग्णालय, स्वर्गीय गीता जेठवाणी महिला भूषण पुरस्कार आस्था फाउंडेशनला, भावना जेठवाणी महिला भूषण पुरस्कार कुमारी फराहनाज अंजुम यांना, सिंधू भूषण पुरस्कार श्री. इंदर प्रेमचंद यांना, जीवन गौरव पुरस्कार श्री. भगवानराव देशमुख आणि श्रीमती शामल देशमुख यांना तर संगीत क्षेत्रात अभिजीत अपस्तंभ यांना गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात डॉ. सान्वी जेठवाणी यांनी सांगितले की, “या महोत्सवाचा उद्देश नांदेडला एक पर्यटनस्थळाबरोबरच देशातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळवून देणे आहे. विविध राज्यांतील कलाकार आणि तृतीयपंथी बांधवांनी येथे येऊन आपली कला सादर करावी, हा महोत्सव त्यासाठीच व्यासपीठ ठरेल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रागेश्री जोशी आणि श्री. मुरलीधर हंबर्डे यांनी प्रभावीपणे केले. दिवसभरात विविध शास्त्रीय, लोकरंग, लावणी व उपशास्त्रीय नृत्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर सखोल विचार मांडत प्रेक्षकांची मने जिंकली.



