वसतिगृह रिकामी करण्याच्या आदेशाविरोधात राष्ट्रवादी व NSUIचे जोरदार आंदोलन

नांदेड – क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्याच्या विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार गट) आणि एनएसयूआय काँग्रेस तर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना वसतिगृह तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, डिसेंबर महिन्यात NET-SET, MPSC, SSC, पोलीस भरती अशा महत्त्वाच्या परीक्षा असल्याने सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळी सुट्टी संपून परत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पाठवण्याचा निर्णय म्हणजे त्यांच्या भविष्याशी सरळसरळ खेळ असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

दूरवरच्या गावांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना सतत ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली. त्याचबरोबर विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची कमतरता, वॉशरूममध्ये पाणी नसणे, स्वच्छतेचा अभाव अशा मूलभूत सुविधा नसतानाही प्रशासनाने त्याकडे कधीच लक्ष दिले नाही; मात्र विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय मात्र तातडीने लागू केला गेला, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत विद्यार्थी संघटनांनी सवाल केला की
“विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्यास सांगणारे कुलगुरूंनी आधी स्वत:चा शासकीय बंगला रिकामा करून दाखवावा!”
क्रीडा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या निवासावर व अभ्यासावर आघात करून घेण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांचे शिक्षण हेच प्राधान्य असले पाहिजे, अशी टीका करण्यात आली.

आजच्या आंदोलनांत विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत तात्काळ निर्णय मागे घेण्याची मागणी केली. तसे न झाल्यास मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल, असा इशाराही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार आणि एनएसयूआय काँग्रेसने दिला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी,nsui चे सुरज शिंदे, अमितसिंग सुखमणी, शिवानंद वाखर्डे इत्यादी उपस्थित होते.



