क्राईम

उद्योजकाने पत्नी चिमुरड्या मुलाला वाढदिवसापूर्वीच संपवलं; डोक्यावर कर्जाचा डोंगर होता

कल्याण: कल्याणमध्ये वास्तव्यला असणाऱ्या एका ४५ वर्षीय उद्योजकाने आपली पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला तोंडावर उशी दाबून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. यानंतर संबंधित उद्योजक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीपक गायकवाड असे या उद्योजकाचे नाव असून त्याने पत्नी आणि मुलाला ठार मारल्यानंतर आपल्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला याविषयी कळवले. तसेच मीदेखील आत्महत्या करत असल्याचे त्याने संबंधित कर्मचाऱ्याला सांगितले होते. मात्र, दीपकचा मृतदेह पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. पत्नी आणि मुलाला ठार मारल्यानंतर दीपक कुठे निघून गेला, याचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. दीपक गायकवाड यांच्या पत्नी आणि मुलाचा शनिवारी वाढदिवस होता. मात्र, त्याच्या आदल्या दिवशीच दीपकने नैराश्याच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, दीपक गायकवाड हा कर्जात बुडालेला होता. दीपक हा त्याची पत्नी अश्विनी गायकवाड (वय ३५), मुलगा अधिराज (वय ७) यांच्यासह रामबाग परिसरातील दीपालय इमारतीमध्ये राहत होता. दीपक हा निधी रिसर्च फायनान्स या कंपनीचा मालक होता. या कंपनीत तब्बल १०० कर्मचारी कामाला आहेत. याशिवाय, कल्याणमध्ये दीपकच्या मालकीची काही स्टेशनरीची दुकाने आणि एक नर्सरी शाळा होती. पोलिसांच्या अंदाजानुसार, दीपकने त्याची पत्नी आणि मुलगा यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांना ठार मारले असावे. त्यानंतर दीपकने घरातील पंख्याला लटकून गळफास घेण्याचा प्रयत्न केला असावा.

पत्नी आणि मुलाला ठार मारल्यानंतर दीपकने त्याच्या कंपनीतील आकाश सुरवडे या कर्मचाऱ्याला फोन केला होता. दीपकने त्याला सांगितले की, मी माझ्या पत्नी आणि मुलाला ठार मारले आहे. मीदेखील आत्महत्या करणार आहे. तू घरी येऊन पाहा, असे दीपकने आकाशला सांगितले. यानंतर आकाश दीपकच्या घरी पोहोचला. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे आकाशने दीपकचा भाऊ आणि अश्विनी गायकवाड यांच्या भावाला फोन करुन त्याठिकाणी बोलावून घेतले. दीपक आपल्याला फोनवर जे काही बोलला, त्याविषयी दोघांना आकाशने माहिती दिली. त्यानंतर या सगळ्यांनी डुप्लिकेट चावीने घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी घरात अश्विनी आणि लहानग्या अधिराजचा मृतदेह आढळून आला.

हत्येच्यापूर्वी बहिणीचा भावाला कॉल

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अश्विनी गायकवाड यांनी त्यांची हत्या होण्याच्या दोन तासांपूर्वी म्हणजे साधारण सकाळी ११च्या सुमारास आपल्या भावाला फोन केला होता. त्यावेळी अश्विनी यांनी त्यांच्या भावाला तातडीने घरी बोलावले होते. त्यानुसार अश्विनी यांचा भाऊ विकी दुपारी १.३० वाजता बहिणीच्या घरी पोहोचला. पण त्यांचा दरवाजा बंद होता. त्यामुळे तो पुन्हा ऑफिसला गेला. यानंतर काहीवेळातच आकाशने त्याला फोन केला.

दीपक गायकवाड यांनी सहा वर्षांपूर्वी निधी रिसर्च फायनान्स ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीला मोठा तोटा झाला होता. त्यामुळे दीपक प्रचंड निराश झाला होता, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.

दीपक गायकवाड यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब हे इतरांमध्ये फारसे मिसळत नसल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून ते याठिकाणी भाड्याने राहत होते. ते इतरांशी फारसे बोलत नसत, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांच्या घरासमोर राहत असलेल्या शेजाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारीच अश्विनी यांनी शनिवारी घरी जेवायला या, असे आमंत्रण दिल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सध्या दीपक गायकवाड यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *