पावसाचे पाणी साचल्याने न्यायाधीश चक्क ट्रॅक्टरने पोहचल्या न्यायालयात
अर्धापूर न्यायालयातील शुक्रवारची घटना, ४ व २ चाकी वाहने अडकून पडली पाण्यात

अर्धापूर :- उध्दव सरोदे – नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.त्यात अनेक शासकीय कार्यालयानांही पाण्याने वेढा दिला होता.त्यामुळे अनेकांना कार्यालयात पोहोचता आले नाही. परंतु अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.बी. सोरेकर यांनी चक्क ट्रॅक्टरवर बसून न्यायालय गाठले.शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने जिल्ह्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले त्यामुळे सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी अनेकांना घराबाहेरही पडता आले नाही तर चारचाकी वाहनेही पुराच्या पाण्यात अडकून पडत होती.त्यामुळे अनेकांना शासकीय कार्यालयात पोहचताच आले नाही.अर्धापूर शहरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
त्यातच न्यायालयाला संबंधित न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम गुत्तेदार,बांधकाम विभाग अर्धापूर व नांदेड आणि नगर पंचायत अर्धापूर यांच्या मनमानीपणा ने,निकृष्ट कामामुळे,ढिसाळ कारभारा मुळे आणि निष्काळजीपणा मुळे न्यायालयाची इमारत मुख्य रस्त्याच्या वर न करता व न्यायालयात साचणारे पाणी ताबडतोब बाहेर कसे जाईल या महत्त्वाच्या बाबींची सोय वेळेत न केल्यामुळे पाण्याने वेढा दिला होता. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकीवर वाहन पोहोचणे शक्य नव्हते.
न्यायालयाच्या इमारतीच्या खालून वर ५ ते ६ फूट पाणी साचल्याने नेहमी प्रमाणे सकाळी आपले कामकाज करण्यासाठी आलेले वकिल साहेब, त्यानंतर आलेले न्यायालयीन कर्मचारी यांना एका मागे एक डोजर,ट्रॅक्टर व आयचर टेम्पोच्या साह्याने न्यायालयात जावून कामकाज करावे लागले.त्यातच न्यायाधिश आर.बी. सोरेकर मॅडम ह्या चक्क ट्रॅक्टरवर बसून न्यायदानासाठी न्यायालयात पोहोचल्या ही बातमी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांना माहिती होताच ते तात्काळ न्यायालयातील साचलेल्या पाण्याचा आढावा घेवून ही समस्या कायमस्वरूपी कशी सोडवण्यात येईल याकरिता आले असता तिथे बांधकाम विभागाचे कर्मचारी,तहसीलदार,नगर पंचायतचे मुख्याधिकारी जगदीश दळवी नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रविण देशमुख, वकिल संघ अर्धापूर आदि सर्व उपस्थित होते परंतु न्यायालयाच्या इमारतीचे बांधकामाचे गुत्तेदार उपस्थित नव्हते.यावेळी संबंधीत सर्व जबाबदारांना लवकरात लवकर न्यायालयात साचणारे पाणी यानंतर कधीच साचणार नाही ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.



