शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर शोककळा – ८ पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले; शोधमोहीम सुरु

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या शिरोडा वेळागर समुद्रकिनारी आज मोठी दुर्घटना घडली. समुद्रात सैर करण्यासाठी गेलेल्या आठ पर्यटकांना लाटांनी ओढून नेले. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून, तिघांना वाचवण्यात यश आले आहे, तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतांमध्ये फरहान इरफान कित्तूर (३४, रा. लोंढा, बेळगाव), इबाद इरफान कित्तूर (१३, रा. लोंढा, बेळगाव) आणि नमीरा आफताब अख्तर (१६, रा. अल्लावर, बेळगाव) यांचा समावेश आहे. वाचलेल्यांमध्ये इसरा इम्रान कित्तूर (१७, रा. लोंढा, बेळगाव) याचा समावेश असून त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, बेपत्ता झालेल्यांमध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६, रा. लोंढा, बेळगाव), इक्वान इमरान कित्तूर (१५, रा. लोंढा, बेळगाव), फरहान मोहम्मद मणियार (२०, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) आणि जाकीर निसार मणियार (१३, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि आपत्कालीन पथकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
ही दुर्घटना घडताच पर्यटकांच्या कुटुंबीयांनी समुद्रकिनारी आक्रोश केला. शांत सैर करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर घातक लाटांनी काळ ओढवल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने राज्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असल्याचा इशारा दिला असून, विशेषतः कोकण किनारपट्टीवर परतीच्या पावसाबरोबरच समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



