अंबाजोगाई ग्रामीण डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई – २४ तासांत आरोपी गजाआड, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाने केवळ २४ तासांच्या आत बनावट चोरी प्रकरणाचा छडा लावत आरोपीसह तब्बल ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हिंगोली येथून सांगली येथे जाण्यासाठी ३० टन हळद (किंमत ४१,७५,५३५) घेऊन निघालेला ट्रक (एमएच २६ एडी २९३५) अंबाजोगाईजवळील लोखंडी सावरगाव परिसरात १ ऑक्टोबर रोजी अडवून पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी चालक सय्यद अजगर याला चाकूचा धाक दाखवून ट्रक चोरून नेल्याची माहिती मिळाली होती.
मात्र तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने सखोल चौकशी केली असता चालक सय्यद अजगर आणि ट्रक मालक नदीम खान या दोघांनी मिळून खोटा गुन्हा दाखल करून हळद चोरी केल्याचे उघड झाले. या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा क्रमांक ३३२/२०२५ भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला होता. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांनी मार्गदर्शन करून पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांना तपास पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक असद शेख, एएसआय रमेश शिरसाट, पोहेकाव किसन घोळवे यांचे पथक परभणी येथे रवाना करण्यात आले. या पथकाने अतिशय शिताफिने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेत २४ तासांच्या आत चोरी गेलेली ५७० पोती हळद (किंमत सुमारे ४० लाख) जप्त करण्यात यश मिळवले.
या उत्कृष्ट आणि तत्पर कार्यवाहीबद्दल पोलिस विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुन्ह्याच्या उकल प्रक्रियेत पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, तपासी अधिकारी रंगनाथ जगताप, डीबी पथक प्रमुख असद शेख, पोलीस उपनिरीक्षक रहीम चौधरी, एएसआय रमेश शिरसाट, पोहेकाव किसान घोळवे, बाबुराव घुगे, प्रवीण उळे, बळीराम बासर, कल्याण देशमाने, नारायण गायकवाड, संग्राम सांगवे, शुभम राऊत, धम्मानंद वाव्हळ, रवी चव्हाण, जयदीप कसबे, राहुल भोसले, नवनाथ मुंडे, जसवंत शेप, बाबासाहेब डोंगरे, विवेकानंद सोळंके आदींनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.



