शहर

तरोडा बुधवार आठवडी बाजाराचे स्थलांतर : महापालिका व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई

नांदेड, १० डिसेंबर :- मागील काही दिवसांपासुन महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजार स्थलांतराचा घडाका लावला असुन आता पालिका हद्दीत दर बुधवारी तरोडा भागात भरणाऱ्या आठवडी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले असुन आता हा आठवडी बाजार कॅनॉल रोड चैतन्य नगर साईबाबा मंदिर चौरस्ता ते डी मार्ट पर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजुस भरविला जाणार आहे. बुधवार दि.१०.११.२०२५ रोजी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने जंबो कारवाई करत तरोडा भागातील मुख्य रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या बाजारास मज्जाव करीत शेतकरी व व्यापाऱ्यांना कॅनल रोडच्या रस्त्याच्या उजव्या बाजुस स्थलांतरीत केले.

महापालिका हद्दीमध्ये बुधवारचा आठवडी बाजार सद्यस्थितीत राज कॉर्नर ते चैतन्य नगर शिवमंदिर चौक, तरोडा नाका शेतकरी चौक ते मालेगाव रोड त्याचप्रमाणे शेतकरी चौक ते तरोडेकर चेंबर्सकडे जाणाऱ्या मार्गावर भरत असल्यामुळे वाहतुक व रहदारीस अडथळा निर्माण होत असे त्याचबरोबर रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना अडचण निर्माण होत असल्यामुळे सदरील बाजार इतरत्र ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्याअनुषंगाने आज तरोडा भागातील कॅनॉल रोड चैतन्य नगर साईबाबा मंदिर चौरस्ता ते डी मार्ट पर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूस बाजार स्थलांतरणाची कार्यवाही पार पाडण्यात आली.

सदरील कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात पालिकेच्या अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक शेवाळकर, जहागीरदार व त्यांचे पोलीस सहकारी, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, गौतम कवडे, मिर्झा बेग, राजेश जाधव, निलावती डावरे, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, निलेश कांबळे यांच्यासह पालिकेचे १०० कर्मचारी तसेच २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

तरोडा भागातील बुधवारचा आठवडी बाजार सद्यस्थितीत राज कॉर्नर ते चैतन्य नगर शिवमंदिर चौक, तरोडा नाका शेतकरी चौक ते मालेगाव रोड़ त्याचप्रमाणे शेतकरी चौक ते तरोडेकर चेंबर्स पर्यंत भरत होता, या मार्गावरुन जाताना येथील बाजारामुळे वाहतुकीची होणारी कोंडी तसेच भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी या आठवडी बाजाराचे स्थलांतर करणे आवश्यक होते. तसेच या रस्त्यावरुन शहरातुन विमानतळाकडे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याने नागरिकांना बाजाराच्या दिवशी विमानतळ गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु आता या भागातील आठवडी बाजार स्थलांतरीत केल्याने व्यापाऱ्यांसह नागरीकांकडुन समाधान व्यक्त केल्या जात आहे. तसेच यापुढे सुध्दा व्यापारी व शेतकरी बांधवांनी बुधवारचा आठवडी बाजार मुख्य मार्गावर न भरवता पालिकेने सुचविलेल्या जागेत अर्थात कॅनॉल रोड चैतन्य नगर साईबाबा मंदिर चौरस्ता ते डी मार्ट पर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजुस भरविण्याचे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *