SC/ST आरक्षण बचावासाठी परभणीत आक्रमक भूमिका – ‘अ, ब, क, ड’ वर्गीकरणाचा तीव्र निषेध, आंदोलनाचा इशारा

परभणी (दि. 25) — अनुसूचित जातींच्या आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘अ, ब, क, ड’ वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात परभणीत आज सावली रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत संतप्त आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली. विविध समाजघटकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्य सरकारच्या भूमिकेचा एकमुखाने तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते डी. एन. दाभाडे साहेब यांनी मार्गदर्शन करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “आरक्षणावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही.” भंते मुदितानंद, डॉ. भगवान धुतमल, जयप्रकाश इंगोले, रामकिशन कांबळे, पंडित टोमके, डॉ. डी. आर. तुपसमुंदरे, सिद्धार्थ भराडे, राजेश रणखांब, एन. जी. खंदारे, डॉ. प्रविण कनकुटे, लखन चव्हाण, सुधीर कांबळे, प्रेमानंद बनसोडे, माधव गायकवाड, सुशील कांबळे, एस. डी. ठोंबरे, आस्वार सर, गो. गा. मस्के, मुंजाजी शेवाळे, डॉ. भाग्यवत, नागोराव माने, रवींद्र सोनकांबळे, सुहास पंडित, एम. एम. बारे, एस. एस. साळवे, चंद्रकांत लहाने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बैठकीत ‘अ, ब, क, ड’ या वर्गीकरणाच्या प्रस्तावावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, हे वर्गीकरण म्हणजे संविधानिक हक्कांवर थेट घाला असून समाजात फूट पाडण्याचा धोकादायक प्रयत्न आहे.
यावेळी बहुमताने ठराव संमत करत मागासवर्गीय जातींमधील ‘अ, ब, क, ड’ आरक्षण वर्गीकरण रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आणि या निर्णयाचा कठोर शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. राज्य सरकारने आक्षेप नोंदवण्यासाठी दिलेला कालावधी अत्यंत अपुरा असल्याचे सांगत तो तात्काळ वाढवण्याची मागणीही करण्यात आली.
बैठकीत येत्या 28 तारखेला परभणीत तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच, या आंदोलनासाठी जिल्हास्तरीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “आरक्षणावर कुठलाही डल्ला सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष उभारला जाईल,” असा स्पष्ट इशारा देत बैठक संपन्न झाली. संयोजक रवींद्र सोनकांबळे यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश मांडला, तर सूत्रसंचालन सुहास पंडित यांनी प्रभावीपणे पार पाडले. आभार प्रदर्शन चंद्रकांत लहाने यांनी केले.
या बैठकीत बौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर तसेच विविध घटकांतील मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, साहित्यिक, डॉक्टर, इंजिनियर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.



