टायगर ऑटो रिक्षा संघटनेतर्फे वाहतूक नियम जनजागृती

नांदेड, दि. 31 ऑगस्ट : कायदा हा सर्वांसाठी समान असून तो जनहितासाठी असतो. त्याचे पालन करणारा प्रत्येक ऑटो रिक्षा चालक खरा कर्तव्यदक्ष चालक ठरतो, या उद्देशाने टायगर ऑटो रिक्षा चालक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वाहतूक नियम जनजागृती व रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम रविवारी वजीराबाद चौकात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे, जमादार शिंदे व माने उपस्थित होते.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ऑटो रिक्षा चालक हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडवणे आणि कायद्याबद्दल आदर निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे.
यावेळी सर्व रिक्षाचालकांनी हातात फ्लेक्स घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यात –
* वाहतूक सिग्नलचे पालन करा
* गणवेश घालूनच व्यवसाय करा
* आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगा
* ओव्हरसीट प्रवासी घेऊ नका
* प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागा
* झेब्रा क्रॉस व सिग्नल वापरा
* चुकीच्या साईडने वाहन चालवू नका
* कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करा
असे संदेश देणारे फलक झळकवण्यात आले.
या प्रसंगी टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, जिल्हा कोषाध्यक्ष धम्मपाल थोरात, सहसचिव गंगा सरोदे, कार्याध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष महमद साबेर, शेख फय्याज, शेख अन्सार आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे ऑटो रिक्षा चालकांमध्ये वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेला चालना मिळाली.



