मराठवाडा

परभणीत जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीचे, व इंडिया आघाडीचे भव्य धरणे आंदोलन

“जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा – संघर्ष समितीचा आरोप”

“हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रीना निवेदन”

परभणी, दि. १० सप्टेंबर – महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती तर्फे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनात इंडिया आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाकप (माले), शेकाप, समाजवादी जन परिषद, भारत जोडो अभियान, मानव मुक्ती मिशन, अं.नि.स. मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस यांसह विविध पुरोगामी संघटना सहभागी झाल्या. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले हजारो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, हे विधेयक घटनाविरोधी असून लोकशाहीस बाधक आहे. राज्यभरातून या विधेयकाविरोधात तब्बल १३ हजार हरकती दाखल झाल्या, त्यापैकी ९,५०० हरकतींमध्ये विधेयक रद्द करण्याची मागणी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विरोध डावलून सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर केला, असा आरोप यावेळी करण्यात आला.

या कायद्यातील तरतुदी पाहता शांततामय मोर्चे, धरणे, उपोषण, सरकारी धोरणांवरील टीका, पत्रकं वा समाजमाध्यमांवरील संदेश देखील “बेकायदेशीर” ठरवले जाऊ शकतात. त्यामुळे कामगार, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, पर्यावरण संरक्षक अशा सर्व संघटनांना बेकायदेशीर घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा व कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा धोका निर्माण होणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

आंदोलनात उपस्थित नेत्यांनी सांगितले की, नक्षलवाद रोखण्यासाठी आधीच UAPA, MCOCA सारखे कायदे अस्तित्वात आहेत. मात्र या नव्या कायद्याचा उद्देश फक्त सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या संघटना व नागरिकांची मुस्कटदाबी करणे हा आहे. “हा कायदा जनसुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीच्या सुरक्षेसाठी आणलेला आहे. लोकशाही व संविधानिक हक्क वाचवण्यासाठी तो तात्काळ रद्द झाला पाहिजे,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या आंदोलनात मा. आ. विजयराव गव्हाणे, मा. खा. अँड. तुकारामजी रेंगे पाटील, मा. आ. बाबाजानी दुर्रानी, तहसीन अहेमद खान, अँड. माधुरीताई क्षीरसागर, कीर्तीकुमार बुरांडे, मारोतराव मोरताटे, सोनालीताई देशमुख, तहसीन खान, भगवान वाघमारे, रवी सोनकांबळे, उद्धव शिंदे, अंबिका डहाळे, दुर्राणी खानम,रवींद्र धर्मे, नदीम इनामदार,अब्दुल माजीद अ. राशिद,सुहास पंडित, भीमप्रकाश गायकवाड, अमोल जाधव,
मा.आ. व्यंकटराव कदम,रामभाऊ घाडगे,क्रोमडे ओकार पवार, पप्पूराज शेळके, संतोष बोबडे,डॉ. सुनील जाधव, नि तीन गोगलगावाकर, बाळासाहेब देशमुख,दिगंबर खरवडे, व्यंकट कदम, डी एस ठोंबरे, प्रसाद गोरे,विष्णूभाऊ मूरकुटे, ,गुलाब हरकळ, प्रल्हादराव पारवे, नासेर शेख, मनीषा केंद्रे, अंकुश कच्छवे, रितेश काळे, सय्यद अन्वर, यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *