देगलूर नाकायावर दररोज ऑटो रिक्षा मुळे होतोय वाहतूक कोंडी तीव्र; अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग आणि अस्वच्छ व्यवस्थेमुळे पोलीस प्रशासन अडचणीत


नांदेड – देगलूर नाका ते माळटेकडी ब्रिज या मुख्य मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी गंभीर होत चालली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात वाढत्या अतिक्रमणांमुळे चार वाहतूक पोलीस असूनही त्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर शिस्त राखणे आणि वाहनांची सतत रांग नियंत्रित करणे हे त्यांच्या दैनंदिन कामाचे आव्हान बनले आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, अतिक्रमण पथक सहा महिन्यातून एकदाच येते आणि तेही केवळ दुकानांसमोरील शेड काढण्यापुरते मर्यादित असते. त्यामुळे उर्वरित मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असून वाहतूक कोंडी वाढण्याचे हे एक प्रमुख कारण असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मोठ्या वाहनांमुळे समस्या अधिक गंभीर
दग्लूर नाका ते माळटेकडी रोडवर काही ट्रक, बस आणि मालवाहू वाहने कपास संशोधन केंद्राच्या भिंतीलगत बेछूटपणे उभी केली जातात. या अवैध पार्किंगमुळे 90 फूट रोड फक्त 20 फूट उरतो, ज्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांची धावपळ होऊन मोठी अडचण निर्माण होते.
प्रवासी वाहतूक, शालेय बसेस, ऑटो रिक्षा, दोनचाकी आणि व्यापारी वाहतूक सगळे एकाच अरुंद रस्त्यावरून जाण्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते.
अनधिकृत ऑटोचालकांचा त्रास कायम
यापूर्वी नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असून, देगलूर नाका परिसरात अनधिकृत ऑटोचालकांचे संख्याबळ मोठे आहे. अनेकांकडे लायसन्स, वाहन कागदपत्रे किंवा परमिट नसताना ते वाहने चालवतात.
नियमबाह्य रितीने रस्ता अडवून प्रवासी चढवणे–उतरणे यामुळे कोंडी आणखीच वाढते.

स्थानिकांची मागणी नागरिकांच्या मते,
* अतिक्रमण पथकाने दर पंधरवड्याला तपासणी मोहीम सुरू करावी
* रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग तातडीने हटवावे
* ट्रक व बस पार्किंगवर कठोर बंदी घालावी
* ऑटोचालकांचे लायसन्स, कागदपत्रे आणि परमिट नियमित तपासावे
* हॉटेल व दुकाने समोरील मोटरसायकलींचे अवैध पार्किंग रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करावी
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून वाहतूक सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



