महापालिका निवडणूक प्रचारावर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मतदानापर्यंत घरोघरी प्रचारास परवानगी, पत्रकांवर बंदी

गेल्या महिनाभरापासून राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. आचारसंहितेनुसार मतदानाच्या काही तास आधी प्रचार थांबवला जातो. त्यानुसार आज महापालिका निवडणुकीचा प्रचार अधिकृतरित्या संपणार असून प्रचार सभा, रॅली आणि जाहीर प्रचार बंद होणार आहेत.

मात्र, याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार की नाही, याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली होती. या बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, जरी सायंकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या तरी उमेदवारांना घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधता येणार आहे.
आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांना 13 जानेवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येईल. मात्र 13 ते 15 जानेवारी या कालावधीत, म्हणजेच मतदानाच्या दिवसापर्यंत राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी असेल. मात्र, या कालावधीत कोणत्याही प्रकारची पत्रके वाटण्यास मनाई करण्यात आली आहे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.



