प्रभाग क्रमांक 11 मधील पाणीटंचाईबाबत नागरिकांचा आक्रोश; नियमित पाणीपुरवठ्याची मागणी

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हैदर बाग येथील पाण्याची टाकी तसेच टेंचिंग ग्राउंड, मिल्लत नगर येथील पाण्याच्या टाक्यांमधून पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रहीम पटेल यांनी मा. आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांना निवेदन देऊन तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. सध्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे परिसरात प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
महानगरपालिकेने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पाच ते सहा दिवसांऐवजी दोन ते तीन दिवसांत नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांनाही देण्यात आली आहे.
अब्दुल रहीम पटेल (काँग्रेस पक्ष सामाजिक कार्यकर्ता, रहेमत नगर, देगलूर नाका, नांदेड) यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



