देगलूर नाका परिसरात अतिक्रमणावर धडक कारवाई; मात्र काही अतिक्रमण कायम – नागरिकांमध्ये नाराजी

नांदेड – देगलूर नाका परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक रस्ते आणि पादचारी मार्ग अडवून ठेवल्यामुळे वाहनचालक व पायी चालणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणाचा अतिरेक वाढत गेला. मात्र, अखेर काल प्रशासनाने मोठ्या लवाजम्यासह या परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली.

अधिकाऱ्यांनी सकाळीच मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कारवाई सुरू केली आणि अनेक अतिक्रमण हटवण्यात यश मिळवले. अतिक्रमण हटवताना नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि प्रशासनाच्या या कारवाईचे जोरदार स्वागत व अभिनंदन केले.
तथापि, फुट ओव्हर ब्रिजच्या बाजूला असलेले काही अतिक्रमण मात्र अद्याप हटवले गेलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “सर्वसामान्य अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जाते, मात्र काही ठिकाणी हात फिरवले जात नाहीत का?” असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाने कारवाई करताना पारदर्शकता ठेवून सर्व अतिक्रमणधारकांवर समान नियम लागू करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.



