पुरस्कार विजेत्या सुमनताई जिरोनेकर यांचा वर्गमित्रांकडून सत्कार

नांदेड, २१- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत दिला जाणारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार २०२३-२४ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झालेल्या सुमनताई जिरोनेकर यांचा वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या १९९४–९५ च्या वर्गमित्रांनी रत्नेश्वरी येथे नुकताच सत्कार केला.
या वेळी सुमनताईंना शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. तब्बल तीन दशके उलटून गेल्यानंतर जुने वर्गमित्र एकत्र आल्याने वातावरण भावविवश व आनंददायक झाले. सत्कारप्रसंगी सुनिता वाळूजकर, अर्चना तांबोळी-शेवाळकर जयश्री कंधारे, सुषमा बोरीकर, विनोद त्रिकूटकर, गजानन टोणगे, कृष्णा वर्धे, बालाजी पुयड, मिलिंद व्यवहारे आदी वर्गमित्र उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मिलिंद व्यवहारे यांनी सुमनताईंच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण जीवन, स्त्रीचे भावविश्व, समाजप्रबोधन या विषयांवरील त्यांच्या लेखनातील शैली व सामाजिक बांधिलकी यावर त्यांनी प्रकाश टाकला.
सत्काराला उत्तर देताना सुमनताई जिरोनेकर म्हणाल्या, हा पुरस्कार मला मिळालेला एक सन्मान असला, तरी आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी आहे. जुन्या मित्रांचा हा आपुलकीचा सत्कार माझ्यासाठी नवचैतन्य घेऊन आला आहे. समाजासाठी आणि साहित्यासाठी माझं लेखन अविरत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व वर्ग मित्रांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थिततांचे आभार सुनिता वाळूजकर यांनी मानले.



