करनूलमध्ये भीषण अपघात -प्रवासी बस पेटली, 19 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

करनूल जिल्ह्यातील चिन्नी टेकुरु गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. हैदराबादहून बंगळुरूकडे निघालेल्या वेमुरी कावेरी ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने एकूण 19 प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर 21 प्रवासी किरकोळ जखमी अवस्थेत बचावले.
अपघाताच्या वेळी बसमध्ये 44 लोक होते त्यात दोन चालक, दोन कर्मचारी आणि 40 प्रवासी होते. अपघात इतका अचानक झाला की प्रवाशांना स्वतःला सावरायलाही वेळ मिळाला नाही. बसचा एक चालक बस थांबवून बाहेर पळाला, तर दुसरा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बस वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकली. धडकेनंतर बसच्या मागील भागात मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच ती आगीत भडकली. पाहता पाहता बस जळून खाक झाली.
घटनेनंतर परिसरात एकच आरडाओरड माजला. काही प्रवाशांनी खिडक्या फोडून स्वतःचा जीव वाचवला, परंतु अनेक जण आत अडकले आणि बाहेर पडू शकले नाहीत. फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले, पण तोपर्यंत बस संपूर्णपणे जळून राख झाली होती.
स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेतली आणि जखमींना करनूल जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने काही प्रवाशांना वेळेत बाहेर पडता आल्याने त्यांचे प्राण वाचले. जखमींपैकी काहीजण हैदराबाद, महबूबनगर आणि राजेंद्रनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात चालकाच्या झोपेमुळे किंवा अतिवेगामुळे घडल्याचे दिसते. शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “आम्ही बसमधून धूर निघताना पाहिला आणि काही सेकंदातच आग एवढी भडकली की आतून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. ते दृश्य डोळ्यांतून जात नाही.”
हा भीषण अपघात करनूल परिसरातील लोकांना हादरवून गेला असून राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे.



