सहाव्या सुजल ग्रामसंवाद राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी धनगरवाडी गावाची निवड दूरदृश्य प्रणालीव्दारे आज ग्रामस्थांशी संवाद

नांदेड,21- जल जीवन मिशन व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सहाव्या सुजल ग्रामसंवाद या दूरदृश्य प्रणालीवरील ग्रामसंवाद कार्यक्रमासाठी नांदेड तालुक्यातील धनगरवाडी गावाची निवड करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम आज बुधवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला असून, ग्रामपंचायत स्तरावरील गाव पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच जल सुरक्षक यांच्यासोबत नाविन्यपूर्ण उपक्रमांवर चर्चा करण्यात येणार आहे. या उपक्रमात या विभागाचे केंद्र व राज्याचे मंत्री महोदय संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सेवा अधिक सक्षम करणे, समुदाय सहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याच्या वतीने धनगरवाडी गावास 10 मिनिटांचे सादरीकरण, जिल्हास्तरावरून 3 मिनिटे तर राज्यस्तरावरून 2 मिनिटे वेळ देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील किमान 20 हर घर जल घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीही या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. सुजल ग्रामसंवादात राज्यातून एकमेक धनगरवाडी ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.
या कार्यक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील यशस्वी जलव्यवस्थापन व ग्रामस्तरीय उपक्रम राज्यासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली, जलजिवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड व कार्यकारी अभियंता राहूल रावसाहेब यांनी दिली आहे.
जम्मू आणि काश्मीर, लढाख, राजस्थान, मिझोरम, तेलंगणा, झारखंड, त्रिपुरा, कर्नाटक, छत्तीसगड या दहा राज्यातील सोळा ग्रामपंचायती सहाव्या सुजल ग्रामसंवाद कार्यक्रमात सहभागी होणार असून या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकारी तसेच राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्याशी दूरदृश्य प्रणालीव्दारे जलशक्ती मंत्री (पेयजल आणि स्वच्छता) श्री. सी. आर. पाटील आज संवाद साधणार आहेत.
सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी उप विभागीय अभियंता एस.डी. देशमुख, जल जीवन मिशनचे माहित, शिक्षण व संवाद सल्लागार डॉ नंदलाल लोकडे, कनिष्ठ अभियंता पार्थ कुलकर्णी, पाणी गुणवत्ता समन्वयक कपेंद्र देसाई, मनुष्यबळ विकास समन्वय सुशिल मानवतकर, आदी परिश्रम घेत आहेत.


