नांदेड ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई : तेलंगणातून येणारा २२ किलो गांजा जप्त, १७ आरोपींवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत तेलंगणातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा गांजा पकडला आहे. या प्रकरणी एकूण १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू आहे. त्यानुसार २१ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरापासून चंदासिंग कॉर्नर येथे पोलिसांनी नाकाबंदी लावली होती.
२२ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २.१० वाजता देगलूरकडून नांदेडकडे येणारी मारुती डिझायर (क्रमांक TS09UC-6085) ही कार संशयितरित्या न थांबता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी पाठलाग करून वाहन थांबवून तपासणी केली असता कारच्या डिकीत पांढऱ्या नायलॉन पिशवीत खाकी टेपने गुंडाळलेले ११ बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये सुमारे २ किलो प्रमाणे एकूण २२ किलो गांजा (हिरवट पाला, काड्या व बिया) मिळून आला.
या गांजाची किंमत अंदाजे ४ लाख ४० हजार रुपये असून जप्त करण्यात आलेल्या कारची किंमत ९ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अकबर अहमद खान पठाण (रा. अंबाजोगाई) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा माल तेलंगणातील बोधन येथून माधव जाधव (रा. धर्मापुरी तांडा, कंधार) याने गाडीत भरून दिल्याची माहिती समोर आली. तसेच या प्रकरणात एकूण १५ आरोपी सप्लाय चेनमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. हा गांजा नांदेड शहरातील विविध ठिकाणी एजंटमार्फत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश होता.
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. उर्वरित १५ आरोपींचा शोध सुरू आहे.



